संग्रामपूर,दि.२.(समर्थ भारत मराठी प्रतिनिधी):
तालुक्यातील गरिबांना घरकुल योजनेपासून वंचित ठेऊ नका. जागेची अडचण असलेल्या काही गावात ग्रामसेवक आणि ग्रामपंचायत ने पुढाकार घेऊन प्रश्न मार्गी लावावा. त्यासाठी उगाच नियमाचा बागुलबुवा नको.अशा सूचना आमदार डाँ संजय कुटे यांनी दि.२८ फेब्रुवारी रोजी झालेल्या वार्षिक आमसभेतून संबंधित अधिकारी आणि कर्मचारी यांना दिल्या. पंचायत समिती च्या वतीने ७ वर्षानंतर जिल्हा परिषद हायस्कुल चे आवारात आ.डॉ. संजय कुटे यांच्या अध्यक्षतेखाली आमसभा घेण्यात आली.
तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांना आपल्या समस्या शासन दरबारी उघडपणे मांडता याव्यात व त्या लवकर निकाली निघाव्यात यासाठी आमसभा हे एक व्यासपीठ आहे. या आमसभेत काही सरपंच महिलांनी,जल जीवन मिशन, पाणी पुरवठा,महसुल,पंचायत समिती आदी विभागातील समस्या व तक्रारी जाहीरपणे व्यक्त केल्या. त्या मध्ये पळशी झाशी, वरवटबकाल,काथरगावं,मनार्डी, कोलद,टुनकी,एकलारा, आणि पेसोडा ग्रामपंचायत च्या सरपंच यांनी विविध समस्या कथन केल्या. प्रत्येक प्रश्नावरआमदार कुटे यांनी समाधानकारक उत्तर देऊन नागरिकांना आश्वासीत केले.तर आवश्यक त्या ठिकाणी स्थळ पाहणी करुन अथवा कागदपत्रे पाहून अल्पावधीतच निर्णय घेण्याच्या सूचना संबधित अधिकाऱ्यांना केल्या.
करमोडा खासदार दत्तक योजनेतील गाव असतांना येथील शबरी आणि रमाई घरकुल चा लाभ मिळाला नाहीं असा प्रश्न काही तरुणांनी निदर्शनास आणून दिला.त्यावर आमदारांनी लगेच गटविकास अधिकारी यांना तातडीने या गावातील घरकुल विषय मार्गी लावण्याचे सांगितले. पिण्याच्या पाण्याविषयी बोलतांना अपव्यय टाळण्याचे आवाहनही त्यांनी केले. येणाऱ्या काही दिवसात शाळाच्या इमारती सुदंर सुविधायुक्त उभारणे, शेत रस्ते तयार करणे,ग्रामपंचायत भवन बांधकाम या कामावर निधी देण्याचे जाहीर केले.
दरम्यान मागील वर्षी चे सोयाबीन सानुग्रह अनुदान अद्याप मिळाले नसल्याचा प्रश्न पिप्री अडगावं येथील वयस्कर रामदास गायगोल यांनी उपस्थित केला.त्यावर आ.डॉ.कुटे यांनी तालुका कृषी अधिकारी यांना विचारणा केली. जवळपास शंभर ते दीडशे शेतकरी वंचित असल्याची माहिती कृषी अधिकारी अमोल बनसोडे यांनी दिली. यावेळी महसूल विभागाचे जबाबदार अधिकारी दिसून आले नाहीत.गटविकास अधिकारी माधव पायगान यांनी प्रास्ताविक भाषणातून आमसभेची माहिती दिली. तर आभार गटविकास अधिकारी श्रेणी २ श्री. टाले यांनी व्यक्त केले.
Add Comment