शिवसेना जिल्हाप्रमुख गजानन वाघ आक्रमक, आंदोलनाचा इशारा.
जळगांव जामोद,दि.१४(समर्थ भारत मराठी प्रतिनिधी):
तालुक्यातील पूर्णा नदी पत्रात बोटीद्वारे होणारा अवैद्य वाळू उपसा बंद करण्याची मागणी शिवसेना उबाठा जिल्हाप्रमुख गजानन वाघ यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
जळगांव जामोद तालुक्यातील पुर्णा नदीपात्रामध्ये माहुली (अ),माहुली (ब),गोळेगांव पांडे,गोळेगांव हूरसाळ, मानेगांव,हिंगणा बाळापूर,दादुलगांव जुने,मांडवा, निमकराड येथील पूर्णा नदीपात्रामध्ये बोटीव्दारे,मशिनने मोटारी लावून या घाटामध्ये पाच-पाच बोटीव्दारे वाळूचा अवैद्यरित्या उपसा सुरू आहे.दररोज विनारॉयल्टी अकोला, यवतमाळ, बुलढाणा जिल्हयामध्ये मोठया प्रमाणात टिप्परव्दारे दररोज शंभर वाहनांमधून हजारो ब्रांस वाळूचा उपसा सूरू आहे.
जीपीएस फोटो, जेसीबी व पोकलैंड व वाहनांचे तारखांसह मोबाईलव्दारे तहसिलदार पवन पाटील यांना दिलेले आहेत. परंतू त्यांच्याकडून कोणत्याच प्रकारची कार्यवाही होत नसल्याचे निवेदनात नमूद असून गजानन वाघ यांनी दि.०९/०२/२०२६ रोजी तहसिल कार्यालयात तहसिलदार पवन पाटील यांचेशी याबाबत चर्चा केली व पुर्णा नदीपात्रातील बोटी स्फोटकाव्दारे नष्ट करा व वाहने जप्तकरण्याबाबत चर्चा केली असता तहसिलदार साहेबांनी मंडल अधिकारी, तलाठी यांना कार्यवाही करण्याचे लेखी कळविले आहे असे सांगीतले परंतू मंडल अधिकारी भारसाकडे यांचे म्हणण्यानुसार आम्हाला पुर्णा नदीपात्रात जाण्याकरिता नावीची आवश्यकता असून स्फोटक सूध्दा तहसिलदारांनी उपलब्ध करून दिलेले नाही.
नदी पात्रामध्ये दररोज हजारो ब्रांसचा अवैधरित्या उपसा सुरू असल्याचे महसुल प्रशासनाने कबुल करून सूध्दा रेती माफीया यांना कोण पाठीशी घालत आहे.? व यांचा गॉडफादर कोण आहे? जळगांव जामोद चे तहसिलदार यांनी मागील वर्षी ज्या अवैध रेतीवाहनांविरूध कार्यवाह्या केल्यात त्या यावर्षी का करत नाहीत ? त्यांच्यावर कुणाचा दबाव आहे का ? किंवा त्यांची काही आर्थीक हितसंबंध आहेत का? जळगांव जामोद चे उपविभागीय अधिकारी शैलेश काळे हे कर्तव्यदक्ष अधिकारी असून सूध्दा का कार्यवाही करत नाहीत ? किंवा त्यांच्या खालील अधिका-यांमार्फत त्यांना कार्यवाही करण्यासंबंधी आदेशीत का करत नाहीत ? असे प्रश्न उपस्थित केले आहेत.
पुर्णा नदीपात्रामध्ये बोटींव्दारे, मशीनरी लावून हजारो ब्रांस रेतीचा उपसा सूरू आहे. तो त्वरीत कार्यवाही करून बंद करावा व अवैधरित्या नदीपात्रातील ५० बोटी व जेसीबी, पोकलॅण्ड, टिप्पर त्वरीत जप्त करून त्यांच्यावर नियमानुसार कार्यवाही न केल्यास ७ दिवसानंतर जळगांव जामोद तालुका शिवसेनेच्या वतीने उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयास घेराव टाकून उग्र निदर्शने व आंदोलन करण्याचा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.














Add Comment