जळगांव जामोद|समर्थ भारत मराठी :
बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खरीप पिकविम्याच्या एकूण १३९.४७ कोटींच्या मदतीपैकी तब्बल १३७.२८ कोटींची रक्कम हि शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाली आहे. तसेच उर्वरित २ कोटी १८ लाखाची रक्कम येत्या ४-५ दिवसात राहिलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनी आपले आधार कार्ड लिंक केलेले बँक खाते तपासून घ्यावे असे आवाहन आ.डॉ.कुटे यांनी केले आहे.
एकंदरीत खरिपाच्या पिक विम्याचा विषय मार्गी लागला असून पीकविम्याचा बुलढाणा, नंदुरबार, सांगली व वाशीम या चारही जिल्ह्याच्या क्लस्टर ७ नुसार ५४१.२७ कोटी इतकी विमा हप्ता रक्कम जमा झाली असून एकूण पात्र नुकसान भरपाई हि ५८६ कोटी म्हणजेच १०८% रक्कम शेतकरी बांधवांना मिळालेली आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांचे रब्बी पीकविमा क्लेम अपात्र करण्यात आले होते. त्यामध्ये जळगाव जामोद, संग्रामपूर व शेगाव या तालुक्यातील १५ हजार पेक्षा जास्त शेतकरी अपात्र ठरविण्यात आले होते. तसेच जिल्ह्यातीलही हजारो शेतकरी अपात्र ठरविण्यात आले होते.जिल्ह्यातील एवढ्या मोठ्या संख्येने अपात्र असलेले शेतकरी पात्र करण्यात यावे याकरिता केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव व आ.डॉ.कुटेसह जिल्ह्यातील सर्वच आमदारांनी जोरदार आग्रह करीत कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत कंपनीवर दबाब निर्माण केला होता.
त्याचाच परिपाक म्हणून कंपनीने सर्व अपात्र शेतकरी पात्र करून सविस्तर प्रस्ताव पुन्हा मंजुरी मिळविण्यासाठी केंद्रीय एजन्सीकडे पाठवलेला आहे. तो प्रस्ताव आता मंजूर होऊन ११०% पर्यंत किंवा त्यापेक्षाही जास्त क्लेम शेतकरी बांधवांना द्यायचा असल्याने अतिरिक्त रकमेची मागणी येत्या चार-पाच दिवसात राज्य शासनाकडे विमा कंपनी करणार असून यासर्व मंजुरीनंतर शेतकऱ्यांना पीकविमा मिळणे सुरु होईल. याबाबत कृषिमंत्री मुंडे साहेब यांच्या दालनामध्ये पीकविमा कंपनीचे महाराष्ट्र राज्य प्रमुख सावंत व सचिन पाटील यांचे सोबत कृषिमंत्री यांचे सचिव भामरे यांच्या उपस्थितीत २५ सप्टेंबर पर्यंत रब्बी पीकविमा बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कसा मिळवून देता येईल याबाबत सविस्तर चर्चा झाली.
बुलढाणा जिल्ह्यातील हजारो अपात्र शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये याकरिता जिल्ह्यातील सर्वच लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेतल्याने पात्र शेतकऱ्यांना हा पीकविमा मिळण्यास उशीर झाला आहे परंतु त्याहीपेक्षा अपात्र शेतकऱ्यांना आम्ही न्याय मिळवून देऊ शकलो याचे समाधान आहे. आज पीकविमा कंपनीच्या प्रमुखांसह झालेल्या बैठकीत दि.२५ सप्टेंबर पर्यंत शेतकऱ्यांना मदत मिळावी याची विमा कंपनीवर जबाबदारी निश्चित केली, अन्यथा २५ सप्टेंबर या तारखेला विमा कंपनीच्या कार्यालयात शेतकऱ्यांसह घुसून तीव्र आंदोलन करणार असा सज्जड दम यावेळी दिला. तसेच येत्या दोन तीन दिवसात संग्रामपूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बाबतीत एक महत्वपूर्ण विषय घेत पत्रकार परिषदेच्या माध्यमातून संपूर्ण घटनाक्रम जनतेसमोर मांडणार आहे असेही यावेळी आ.डॉ.कुटे म्हणाले.
Add Comment