अर्थव्यवस्था व संरक्षण व्यवस्थाही मजबूत:अवकाळी पावसाचाही फटका.
भेंडवड च्या घटमांडणीचे भाकीत जाहीर.
जळगांव जामोद | समर्थ भारत मराठी :
घटमांडणीत असलेला पानविडा यंदाही कायम असून करंजी,करडी कायम असल्याने देशाची अर्थव्यवस्था व संरक्षण व्यवस्था मजबूत राहणार आहे तर सर्वसाधारण पीक परिस्थितीसह पावसाळाही सर्वसाधारण राहणार असल्याचे दिलासादायक भाकीत शेतकऱ्यांचे लक्ष लागून असलेल्या तालुक्यातील भेंडवड येथील घटमांडणीत आज दि.११ रोजी पहाटेच्या सुमारास चंद्रभान महाराजांचे वंशज पुंजाजी महाराज तसेच त्याचे सहकारी सारंगधर महाराज यांनी जाहीर केले.
अशी झाली घटमांडणी :
पीक पाण्यासह राजकीय स्थितीचे भाकीत करण्याची जवळपास साडे तीनशे वर्षांपूर्वीपासून ची परंपरा असलेली घटमांडणी अक्षयतृतीयेच्या दिवशी करण्यात आली.दि.१० रोजी सायंकाळच्या सुमारास भेंडवड गावाजवळील शेतात पारंपरिक पद्धतीने घटमांडणी करण्यात आली. अक्षयतृतीयेच्या विविध धार्मिक विधी नंतर चंद्रभान महाराजांच्या जयघोषात सुमारे सात फूट व्यासाचा गोलाकार घट तयार करण्यात आला. या घटामध्ये १८ प्रकारच्या धान्यराशी अंबाडी, कपाशी,ज्वारी,तूर,मूग,उडीद, तीळ,भादली,बाजरी,हिवाळी मुंग,साइ(तांदूळ), जवस, लाख,वाटाणा,गहू,हरभरा,करडी,मसूर समान अंतरावर गोलाकार घटामध्ये मांडण्यात आल्या. घटाच्या मध्यभागी दोन फूट व्यासाचा खड्डा करून त्यामध्ये मातीची चार ढेकळे ठेवण्यात आली. ही मातीची चार ढेकळे पावसाच्या चार महिन्याचे प्रतीक मानण्यात येते. त्या चार ढेकळांवर पाण्याने भरलेला करवा(मातीचे भांडे) ठेवण्यात आले. करव्यावर वडा, भजा, करंजी(कानोला),पुरी,सांडोळी, कुरडी, पापड,पानविडा, सुपारी इ. ठेवण्यात आले.घटातील अंबाडी हे कुलदैवत, मसूर शत्रूचे,करडी संरक्षण व्यवस्था, सुपारी राजा,पान विडा राजाची गादी,पुरी पृथ्वीचे,सांडोळी, कुरडी चारापाण्याचे, करंजी अर्थव्यवस्थेचे प्रतीक मानण्यात येते.
पिकपरिस्थिती साधारण, ऑगस्टमध्ये मध्ये सर्वाधिक पाऊस :-
खरीप हंगामात जून महिन्यात कमी पाऊस,जुलै महिन्यात सर्वसाधारण पाऊस,ऑगस्टमध्ये चांगला सर्वाधिक पाऊस, सप्टेंबर मध्ये चांगला पाऊस तसेच अवकाळी पावसाचा धोकाही यावेळी मांडणीत वर्तविण्यात आला आहे.
विदर्भातील प्रमुख माणल्या जाणारे कपाशी चे (मोघम) अनिश्चित राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे.अंबाडी हे कुलदेवतेचे प्रतीक आहे, घटात अंबाडी कायम असल्याने कुलदैवत कायम राहील व कुलदैवतेचा प्रकोप राहणार नाही.खरिपातील मुख्य पीक ज्वारी मोघम आहे, पीक साधारण राहील.तुर सुद्धा मोघम आहे पीक सर्वसाधारण येईल.मुंग मोघम आहेत त्यामुळे पीक साधारण येईल. उडीद घटात फैलेले आहे त्यामुळे साधारण पीक येईल.तिळाचे पीक चांगले येईल कारण घटात तीळ आतल्या व बाहेरच्या बाजूने फैललेलेआहेत.भादली यावर्षी फैललेली आहे व ढिग दबलेला आहे त्यामुळे रोगराईत वाढ संभवते.बाजरी फैलेली आहे त्यामुळे बाजरीचे पीक चांगले आहे.मठाचा एक दाणा बाहेर असल्याने पीक सर्वसाधारण राहील. साळी(तांदूळ) आत व बाहेर फैललेली आहे त्यामुळे पीक चांगलं येईल. जवसाच पीक चांगलं येईल व भावात तेजी सोबतच नासाडी संभवते.कारण घटात जवस चारही बाजूने फैललेले आहे. लाख,वाटाणा मोघम असल्याने सर्वसाधारण पीक येईल.गहू एक दाना हरभऱ्याच्या ढिगाकडे बाहेर असल्याने पीक चांगले व भावात तेजी राहील.हरभरा पीक चांगलं येण्याचं भाकीत मांडणीत वर्तविण्यात आले आहे. एकंदरीत सर्वसाधारण पीक परिस्थिती राहील.
राजकीय भाकीत टाळली :-
देशात आदर्श आचारसंहिता लागू असल्यामुळे घटमांडणीत राजकीय भाकिते करण्याचे टाळण्यात आहे. मात्र घटातील पानविडा कायम आहे.त्यावरून उपस्थितांनी याबाबत आपला अंदाज लावला.
अर्थव्यवस्था मजबूत :-
घटामध्ये ठेवलेली करंजी कायम आहे त्यामुळे अर्थव्यवस्थेच प्रतीक कायम असल्याने देशाची अर्थव्यवस्था मजबूत राहणार आहे.यापूर्वी आर्थिक मंदी चे भाकीत तंतोतंत खर ठरले आहे हे विशेष.मात्र यावर्षी करंजी कायम राहिल्याने अर्थव्यवस्थेवर कोणताही ताण राहणार नाही.
पृथ्वीवर नैसर्गिक आपत्ती नाही जलाशये तुडुंब :-
घटामध्ये पृथ्वीच प्रतीक मानण्यात येणारी पुरी कायम असल्याने पृथ्वीवर नैसर्गिक आपत्ती ओढविण्याची शक्यता नसून कराव्यात भरपूर पाणी असल्याने जलाशये, समुद्रात भरपूर पाणी राहील.
चारापाणीही भरपूर :-
घटातील सांडोळी,कुरडी कायम आहेत त्यामुळे भरपूर चारापाणी राहणार आहे.
घुसखोरी ची डोकेदुखी कमी :-
घटातील मसूर व करडी वरून देशाच्या संरक्षण व्यवस्थेसह परकीय शत्रूंच्या घुसखोरी बाबत करण्यात येते.यावेळी घटात मसूर कायम आहेत त्यामुळे घुसखोरीचा त्रास कमी राहील तसेच करडी फैललेली आहे त्यामुळे संरक्षण व्यवस्था मजबूत राहील.
अवकाळी पावसाचा धोका तर साधारण पावसाळा :-
पावसाबाबत भाकीत मांडणीत केलेले आहे. जून महिन्यात पाऊस कमी राहील. जुलैमध्ये साधारण ,तर ऑगस्ट मध्ये सर्वाधिक पाऊस,तर सप्टेंबर मध्ये चांगला पाऊस वर्तविण्यात आला. सप्टेंबर महिन्यात पावसाचे प्रमाण चांगलं राहणार असले तरी यावेळी अवकाळी पावसाचा धोकाही संभवतो त्यामुळे पिकांची नासाडी होण्याची शक्यता आहे.
पारावरील मांडणी :-
गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मारोतीच्या पारावरही मांडणी करण्यात येते त्याचे नऊ दिवसांनी पुंजाजी महाराज निरीक्षण करतात त्या मांडणीत घटातील माल काळा आणि तांबडा पडला आहे.म्हैस, गाढव,झुरळ,पिसवा,गोम घटात आहेत. पान विडा व सुपारी कायम आहे.एकंदरीत पारावरील मांडणेत पिकांची परिस्थिती सर्वसाधारण पण रोगराई राहील.
Add Comment