जळगांव जामोद | समर्थ भारत मराठी :
जळगाव जामोद व संग्रामपूर तालुक्यातील अकोट खंडवा रेल्वे प्रोजेक्ट भूसंपादना बाबत विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी आमरण उपोषणाचा मार्ग अवलंबून आहे. या उपोषणास एकूण वीस शेतकरी बसलेले असून पन्नास पेक्षा अधिक शेतकरी साखळी पद्धतीने उपोषण करीत आहेत.१५ मे २०२३ रोजी प्रसिद्ध झालेल्या अधिसूचनेनुसार प्रस्तावित अकोट खंडवा रेल्वे प्रकल्पातील भूसंपादन तुगलकी पद्धतीने सुरू असून शेतकऱ्यांना सारासार वाऱ्यावर सोडल्याचे चित्र आहे.
बागायत शेतीनुसार योग्य मूल्यांकन करावे व योग्य मोबदला द्यावा,तहसीलदारांनी बागायातशेती बाबत तलाठी यांच्यामार्फत केलेल्या मोका तपासणी नुसार दि.१ मार्च रोजी काढलेल्या पत्रानुसार अधिकतर शेतकरी बागायती आहेत असे लिहिले त्या अनुषंगाने बागायती शेतकऱ्यांची रीतसर यादी व तलाठी यांच्या अहवालाची प्रत देण्यात यावी,संग्रामपूर तालुक्यातील बाधित शेतकऱ्यांनी ७/१२ दुरुस्तीसाठी अर्ज दिलेला असून संबंधित तहसीलदारांनी तात्काळ मोका तपासणीचे आदेश काढावे व त्यानुसार अभिप्राय सात दिवसाच्या आत द्यावा,मूल्यांकन करतेवेळी वास्तविक बाजार मूल्य विचारात घेऊन त्यानुसार निवाडा करावा,भूमी संपादन पुनर्वसन व पुनर्स्थापना करतांना वाजवी भरपाई मिळण्याचा पारदर्शक हक्क अधिनियम २०१३ मधील सर्व तरतुदी लागू कराव्यात,नवीन भूसंपादन २०१३ या कायद्यात बाधित शेतकऱ्यांचे पुरावे रेकॉर्डवर घेऊन बैठक घेण्याची तरतूद आहे तदनंतर २० इ नुसार निवाडा प्रसिद्ध करावा,सोशल इम्पॅक्ट असिस्टमेंट रिपोर्ट हा सदर भूसंपादन प्रक्रियेमध्ये तयार करण्यात आलेला नाही परंतु त्यातील शेतकरी हिताच्या सर्व तरतुदी विचारात घेण्यात याव्या,फळझाडांचे मूल्यांकन करतांना वास्तविक फळांचे बाजार मूल्य विचारात घ्यावे व त्यानुसार मोबदला द्यावा,सदर रेल्वे प्रकल्पामुळे शेतीचे दोन भागात विभाजन होत असून त्यातील वहिती योग्य नसलेल्या क्षेत्राची मोजणी करून भूसंपादन प्रक्रियेत समाविष्ट करावी, इलेक्ट्रिक पोल व डीपीचे स्थानांतर बाधित शेतकऱ्यांच्या सोयीप्रमाणे करावे अन्यथा यामध्ये झालेल्या उभ्या पिकांचे नुकसान भरपाई द्यावी,२० डी अंतर्गत दाखल केलेल्या सर्व हरकतीचे निवारण करण्यासाठी शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन अभिप्राय सांगावा व सर्व हरकती रेकॉर्डवर घेऊन निकाली काढावेत,भूसंपादित केलेल्या क्षेत्राच्या पाण्याचा योग्य प्रकारे निसरा करून देण्यात यावा,शेतीकरिता नवीन वहिवाटेकरीता पक्के डांबरी रस्ते तसेच जीथे गरज आहे तिथे अंडरपास व वर ब्रिज बनवून द्यावे.या मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी उपोषणाचा मार्ग अवलंबला आहे.मागण्या मान्य करून शेतीस योग्य मोबदला न मिळाल्यास शासनास एक इंच ही जमीन संपादित करू देणार नाही व जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आमरण उपोषण असेच चालू राहील असा निर्धार शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे.
“आमच्या मागण्या चुकीच्या व खोटे असतील तर आम्हाला एक रुपयाही देऊ नका आम्ही आमची जमीन फुकट देतो जर आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर एक इंच ही जागा आम्ही देणार नाही.”
विजय शांतीलाल टावरी (शेतकरी, जामोद)
“आमची शेती मागील २० वर्षांपासून बागायती आहे. आमच्या पीक पेरामध्ये संत्र्यासारखी बहुवार्षिक पिके नमूद आहेत.दुय्यम निबंधक यांनी दिलेल्या मूल्यांकन पत्रात बागायती मूल्यांकन दिले आहे,तरीही ७/१२ वर जिरायती लिहिले आहे.आम्हाला बागायतीचा मोबदला मिळाला नाही तर आम्ही जमीन देणार नाही.”
अनंता सुभाष लोने.(शेतकरी,जामोद)
“ग्रामपंचायत जामोद च्या वतीने सदर शेतीचे पंचनामे करून ७/१२ वर जिरायतीची दुरुस्ती करून बागायती करण्याबाबत निवेदन दिलेले आहे.”
गंगुबाई पुंडलिकराव दामधर.(लोकनियुक्त सरपंच ग्रामपंचायत,जामोद)
Add Comment