जळगांव जामोद | समर्थ भारत मराठी :
शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आयोजित तक्रार निवारण शिबिरात तहसीलचे कर्मचारी अनुपस्थित राहिल्याने वडशिंगी भागाचे शेतकरी चांगलेच आक्रमक झाले त्यामुळे राष्ट्रवादी(शरद पवार गट) चे प्रसेनजीत पाटील यांनी स्थानिक तहसील कार्यालयात तहसीलदारांच्या कक्षाला कुलूप ठोकत रोष व्यक्त केला.

जुलै २०२३ मध्ये जळगाव जामोद, संग्रामपुर तालुक्यात आलेल्या महापुरामध्ये शेतकऱ्यांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले.हजारो हेक्टर जमीन खरडून गेली,पिकांचही नुकसान झाले.अश्या परिस्थितीत हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना शासनाकडून मदतीची आशा होती.परंतु नुकसान झाल्यानंतर तब्बल आठ महिन्यांनी नुकसानीच्या याद्या जाहीर झाल्या.त्यामध्ये ज्यांच खरोखर नुकसान झालं, जमिनी खरडून गेल्या त्यांना मदतीपासून वंचित ठेवण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसने प्रसेनजीत पाटिल यांच्या नेतृत्वात तसेच विविध पक्ष संघटना यांनी विविध प्रकारे आंदोलने केली. आठ दिवसापूर्वी तहसील कार्यालयाने नोटीस काढून तक्रारकर्त्या शेतकऱ्यांसाठी दि.१५ पासून महसूल मंडळानुसार तक्रार निवारण्यासाठी शिबिराचे आयोजन केले.आज वडशिंगी महसूल मंडळाला तक्रार निवारण शिबिरासाठी बोलावलेलं असतांना तहसीलदारांसह सर्व कर्मचारी गैरहजर असल्याने उपस्थित शेतकरी संतप्त झाले.त्यामुळे प्रशासनाचा निषेध करीत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे प्रसेनजीत पाटिल यांनी तहसीलदारांच्या कक्षाला कुलुप ठोकले.
यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अविनाश उमरकर, वंचितचे सुनिल बोदडे, सुहास वाघ,अरुण निंबोळकर,आशिष वायझोडे,राजेश वाघ यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Add Comment