जळगांव जामोद|समर्थ भारत मराठी :
ग्राम पंचायत जामोद अंतर्गत येणाऱ्या खेल शिवापूर, खेल लोण, खेल वर्गे, खेल माळी, खेल पारस शिवारातील बागायती असलेल्या परंतु ७/१२ उताऱ्यावर जिरायती असा उल्लेख असलेल्या शेत जमिनीची बागायती म्हणून नोंद करण्याची मागणी जामोदच्या लोकनियुक्त सरपंच गंगुबाई दामधर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत पाठविण्यात आलेल्या निवेदनातून केली आहे.
परिसरात ७/१२ उताऱ्यावर जिरायती म्हणून नोंद आहे. प्रत्यक्षात ह्या जमिनी बागायती आहेत. ह्या शिवारामध्ये मुबलक पाण्याची व्यवस्था असल्याने बारमही बागायत केले जाते. सातबारावर जिरायती नोंद असल्याने कोणताही शासकीय मोबदला मिळताना,जमीन विक्री करताना शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते.
ह्या, शिवारातील शेतकरी २५ वर्षांपेक्षा अधिक काळापासून बारामाही बागायती शेती करीत आहेत. तसेच शेतकऱ्यांच्या ७/१२ उताऱ्यावर विहीर / बोअर ची नोंद असुन, बारमाही व बहुवार्षिक बागायती पिकांचा पिक पेरा नमूद आहे.शेतकऱ्यांची बागायती असलेल्या शेतजामीन च्या ७/१२ उताऱ्यावर जिरायती असा उल्लेख असल्याने शेतकऱ्यांना बँक कर्ज घेते वेळी कर्ज रक्कम कमी मंजूर होत आहे तसेच पिक विमा व विविध पिक नुकसान व शेत नुकसान भरपाई ची रक्कम पण कमी मिळत आहे.
विविध सार्वजनिक उपक्रमांसाठी जमीन अधिग्रहण करते वेळी सदर जमिनीचा ७/१२ उताऱ्यावर जिरायती असा उल्लेख असल्याने शेतकऱ्यांना आपल्या बागायती शेती असतांनाही जिरायती शेतीच्या भावात मोबदला मिळाल्यास शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होऊ शकते. बागायती जमिनींवर रोजगार हमी उपकर व शिक्षण उपकर वसूल केला जातो व तो शेतसाऱ्यासोबतच वसूल केला जातो, परंतु बागायती जमिनींची ७/१२ उताऱ्यावर जिरायती असा उल्लेख असल्याने शासनाचा महसूल पण बुडत आहे. तरी ह्या सर्व जमिनीची जिरायती म्हणून असलेली नोंद रद्द करून सातबारावर बागायती नोंद करण्यात यावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.निवेदन देतांना परीसरातील शेतकरी उपस्थित होते.

Add Comment