दुसरबीड | समर्थ भारत मराठी :
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक बोर्डाचा इयत्ता बारावीचा निकाल मंगळवारी दुपारी जाहीर झाला. बुलढाणा जिल्हा परिषदेचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांनी यावर्षी कॉपीमुक्त अभियान मोहीम झुम मिटींगच्या माध्यमाने करण्याचा निर्णय घेतला होता. ऑन कॅमेरा परिक्षा घेतल्याने विज्ञान शाखेचा निकाल परंपरेनुसार कायम असला तरी कला विभागाचा मात्र या ऑन कॅमेरा परीक्षेने टक्का घसरला आहे.
प्रोफेसर जावेदखान उर्दू जुनियर कॉलेज दुसरबीडच्या विज्ञान शाखेत एकुण ४७ विद्यार्थ्यांनी परिक्षेकरिता नोंदणी केली होती. यामध्ये प्रथम श्रेणीत १९ तर द्वितीय श्रेणीत २१ विद्यार्थ्यांनी प्राविण्य मिळवले असून शाळेचा ८५.१० टक्के एवढा निकाल लागला आहे. तर कला शाखेत ३३ पैकी २६ विद्यार्थी परिक्षेस पात्र झाले यापैकी ७ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाल्याने कला शाखेचा २६.९२ टक्के निकाल लागला आहे. नारायणराव नागरे महाविद्यालयाच्या विज्ञान विभागात एकूण ८८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यामध्ये प्रथम श्रेणीत ४० तर द्वितीय श्रेणीत २५ विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याने ८३.९० टक्के तर कला शाखेत ३४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती यापैकी ८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून कला शाखेचा २३.५२ टक्के निकाल लागला आहे. तसेच जीवन विकास महाविद्यालयाच्या विज्ञान शाखेत १७९ विद्यार्थी परिक्षेला बसले होते. यामध्ये प्रथम श्रेणीत १३१ तर द्वितीय श्रेणीत २६ विद्यार्थी पास झाले असून ९६.८ एवढा निकाल लागला आहे. तर कला शाखेतील ३९ विद्यार्थ्यांपैकी ३१ विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याने कला शाखेचा निकाल ८१.५७ टक्के निकाल लागला आहे. तसेच जान्हवी ज्युनिअर कॉलेजमध्ये विज्ञान शाखेत ३८ विद्यार्थी परिक्षेस बसले होते. यापैकी ३६ विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याने ९४.७३ टक्के एवढा निकाल आहे.
विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांनी प्राविण्य श्रेणीत बाजी मारली असून कला शाखेतील विद्यार्थ्यांनीही खचुन न जाता परिश्रम करण्याची गरज आहे. यावेळी राष्ट्रीय शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष तथा राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस इरफानअली शेख, भगवानबाबा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष तथा माजी आमदार तोताराम कायंदे, लोकशिक्षण संस्थेचे सचिव गणेशराजे जाधव प्राचार्य डॉ.विजय नागरे, प्राचार्य सादीक शेख, प्राचार्य गणेश भांगे, मनोहर देशमुख यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या.
Add Comment