संग्रामपूर|समर्थ भारत मराठी :
संग्रामपूर येथील स्टेट बँक ऑफ इंडियाचे ए.टी.एम.१७ लाखांच्या रोकडसह चोरट्यांनी पहाटे चोरून नेल्याची घटना उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली.पोलिसांनी काही तासातच चोरट्यांना बेड्या ठोकल्या आहेत.
संग्रामपूर शहरातील मुख्य रस्त्यावरील स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम तोडून चोरी झाल्याची घटना दि.७ रोजी सकाळी ३ वाजून ४१ मी.च्या दरम्यान घडली.चोरट्यांनी अवजाराच्या साह्याने एटीएम पूर्ण तोडून ते चारचाकी वाहनात टाकले व वरवट बकाल कडे पसार झाले ही घटना सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये कैद झाली.याची माहिती मिळताच ठाणेदारांनी जिल्हा पोलीस नियंत्रण कक्षाला याची माहिती दिली.तसेच जालना,अकोला,जळगाव या सीमावर्ती जिल्ह्यांच्या पोलीस अधिकाऱ्यांना तपासात सहकार्य करण्याची विनंती केली.
पोलिसांनी चोरट्यांचा शोध घेण्यासाठी सर्वत्र नाकाबंदी चालू केली.या चोरी प्रकरणाचा उलगडा काही तासांतच पोलिसांनी लावला व जालना पोलीस स्टेशन हद्दीमध्ये एटीएम चोरट्यांना पकडून पोलिसांनी बेड्या ठोकल्या.यामध्ये तीन आरोपी फरार झाले असून दोन आरोपींना एटीएम मशिन व त्याच्या वाहनासह पकडण्यात जालना पोलिसांना यश आले.त्यांना ताब्यात घेण्यासाठी तामगाव पोलीस ठाण्याचे विशेष पथक जालन्याकडे रवाना झाले आहे.पथकात पोलीसासह स्टेट बँकेचे संग्रामपूर शाखा व्यवस्थापक,एटीएम तंत्रज्ञ यांचा समावेश आहे.
घटनेत तीन आरोपी फरार असून त्यांचा शोध घेण्यात येत आहे.पकडण्यात आलेल्या दोघा साथीदारकडून त्यांची माहिती घेऊन त्यांनाही लवकरच जेरबंद करण्यात येईल अशी माहिती ठाणेदार उलेमाले यांनी दिली.
Add Comment